सात वर्षांनंतर दिलासा;
कळंब
कळंब नगरपरिषदेत कार्यरत असलेले तत्कालीन लिपीक संतोष दोनतुलवर यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्याय मिळाला आहे. २०१६ मध्ये दाखल झालेल्या लाचलुचपत प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेभोसले यांनी त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत तत्कालीन लिपिक संतोष दोनतुलवर काम पाहत असताना शौचालय योजनेसाठी अर्जदाराने लाच मागणीचा आरोप केला होता. या आरोपावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि खटला सुरु झाला. सात वर्षांच्या सुनावणीनंतर मात्र न्यायालयाने सरकार पक्षाचे सर्व दावे फेटाळले.
बचाव पक्षाने उलटतपासणीदरम्यान दाखवून दिले की अर्ज अपूर्ण होता, कोणतेही प्रलंबित काम नव्हते, चेक देण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे, तसेच परवानगीशिवाय ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले होते. याशिवाय पंचनाम्यातील विसंगती, ६५ बी प्रमाणपत्रातील त्रुटी आणि पैशांची देवाणघेवाण सिद्ध न होणे यामुळे आरोप कोसळले.
सात वर्षे न्यायालयीन लढाई झेलल्यानंतर दोनतुलवर यांची निर्दोष सुटका झाली आहे. अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांना अॅड. मंजुषा साखरे, अॅड. अमित गोळे, अॅड. महेश लोहार, अॅड. शुभम तांबे, अॅड. अर्चना कांबळे, अॅड. योगेश कुलकर्णी, अॅड. संकेत गोरे, अॅड. उदय आडेकर, अॅड. ओंकार कोरेगावकर, अॅड. महेश पवार, अॅड. पृथ्वीराज खोचरे व रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.











