शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून अन्नदान
कळंब :
चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत येरमाळा नगरीत भक्तीचा दरवळ दरवळत असताना, कडक उन्हानेही भाविकांची पावले थांबवू शकली नाहीत. डोळ्यांत श्रद्धा, ओठांवर “आई येडेश्वरी”चा जप आणि मनात अढळ विश्वास घेऊन हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत होते. या गर्दीत काहींच्या चेहऱ्यावर थकवा होता, तर काहींच्या अंगावर उन्हाचा तडाखा स्पष्ट जाणवत होता… पण त्याच क्षणी त्यांना मिळाला तो सेवाभावाचा दिलासा.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या अन्नदान व अल्पोपहार केंद्राने या यात्रेला एक वेगळेच माणुसकीचे रूप दिले. थंड पाण्याचा घोट आणि गरम, ताज्या खिचडीचा घास घेताच भाविकांच्या चेहऱ्यावर पुन्हा ऊर्जा आणि समाधान दिसू लागले. तब्बल १२०० किलो खिचडीचे वाटप करत हजारो भाविकांची भूक भागविण्याचे मोठे पुण्यकर्म या उपक्रमातून पार पडले.
ही फक्त अन्नदानाची सेवा नव्हती, तर प्रत्येक भाविकाला “तुम्ही एकटे नाही” हा दिलासा देणारी मायेची सावली होती. कार्यकर्ते स्वतः उन्हात उभे राहून प्रत्येकाला प्रेमाने अन्न देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भाविकांच्या डोळ्यांत दिसणारी कृतज्ञता, हे दृश्य यात्रेतील खरे समाधान देणारे ठरले.
अन्नदान ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र सेवा मानली जाते. “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या भावनेतून प्रेरित होऊन अजित पिंगळे यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या गरजू व दूरवरून आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळतो.
या सेवाभावी कार्यात उपजिल्हा प्रमुख आनंत वाघमारे, तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, रामकिसन कोकाटे, शितल चोंदे, सूरज बारकुल, विकास कदम, पिनु जाधवर, बंटी चोंदे, नारायण टेकाळे, युवराज धाकतोडे, किरण बोराडे, स्वरूप पिंगळे, सागर शिंदे, रोहित मुंढे, शिवा बाराते यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
येरमाळा यात्रेत भक्तीबरोबरच माणुसकीचाही हा सुंदर सोहळा अनुभवायला मिळत आहे.










