सरकार झोपलंय का?
कळंब:
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे बँका जबरदस्तीने कर्जवसुलीचा दंडुका उगारत आहेत, जिल्हाधिकारी यांच्या स्पष्ट आदेशानंतरही काही बँका त्या आदेशांना धाब्यावर बसवत, शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावत आहेत. हे फक्त आदेशांचं उल्लंघन नाही, तर शेतकऱ्यांच्या विश्वासावरचा मोठा घात आहे,
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व बँकांना आदेश दिले होते की, शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणतीही नवीन नोटीस देऊ नये. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हा आदेश सर्व बँकांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. मात्र कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील शेतकऱ्यांना येरमाळा शाखेतील एका बँकेने कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बँकेने थेट हरताळ फासल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाचे आदेश एकीकडे आणि बँकांची मनमानी दुसरीकडे शेतकरी नेमकं कुणावर विश्वास ठेवावा? असा सवाल आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
रजाकारशाही सुरूच….
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश असताना सुध्दा कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे चालु आहे. अतीवृष्टी च्या नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत. शेती उद्ध्वस्त झाली, जनावरे वाहून गेली, संसार उध्वस्त झाला आणि अशा परिस्थितीत बँकांनी कर्ज फेडण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत
नोटिसांची होळी चा इशारा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी थेट इशारा दिला आहे की, जर बँकांनी त्वरित कर्जवसुली थांबवली नाही, तर या बेकायदेशीर नोटिसांची होळी करण्यात येईल. शासन गप्प, बँका बेधडक आणि शेतकरी मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकलेला आहे. हे थांबायलाच हवं, प्रशासन जर बँकांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बँकांची दादागिरी थांबवा…
हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की बँक माफियांचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवून, कर्ज फेडण्याचा दबाव टाकला जातोय. आम्ही शांत आहोत म्हणजे कमजोर नाही. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.











