प्रेम, वाद आणि मृत्यू…! चोराखळी जंगलात तरुणाची गळफास घेऊन धक्कादायक आत्महत्या
कळंब
धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरात एकाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध, वाद आणि त्यातून उचललेले टोकाचे पाऊल… एका २५ वर्षीय तरुणाने चोराखळीच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मयत तरुणाचे नाव अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५, रा. रुई, ढोकी ता. धाराशिव) असे आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अश्रुबा याचे आळणी फाटा येथील साई कला केंद्रात काम करणाऱ्या लातूर येथील रहिवासी महिलेसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघे शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना अचानक अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. याच एका फोनमुळे प्रवासातच वादाची ठिणगी पडली आणि काही क्षणातच ती आग बनली.
वाद विकोपाला गेल्यावर अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संतापाच्या भरात त्याने थेट चोराखळी जंगल गाठले आणि तेथे झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे करत आहेत.
या घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या तणावाची ही आणखी एक धक्कादायक परिणती मानली जात आहे.








