नळदुर्ग
येथील दिशा नागरी पतसंस्थेमधून ४ किलो ७६३ ग्रॅम सोने आणि २ लाख २१ हजार रुपये असा एकूण २ कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल ८ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीस गेला होता. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पतसंस्थेत कार्यरत असलेला लिपीक राहुल राजेंद्र जाधव यानेच साथीदारांच्या मदतीने चोरी केली असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यावर इतर साथीदारांची नावेही उघड झाली. चोरीचा मुद्देमाल त्यांच्याकडे असल्याचीही माहिती मिळाली.
पुण्यातून तीन आरोपी अटक
आरोपी हे पूर्वीपासून दरोडा, जबरी चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल राजेंद्र जाधव(नळदुर्ग), सुशिल संजय राठोड (नळदुर्ग), संजय अमृत जाधव (लाडवंतीवाडी, कर्नाटक) शिलरत्न महादेव गायकवाड (औराद ता. उमरगा) तीन आरोपींना पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पकडले. चौकशीत आरोपींनी मुद्देमाल शेतातील विहिरीत लपवून ठेवल्याचे सांगितले. पथकाने तेथून १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे, अंदाजे १ कोटी ७५ हजार ७२५ रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवली आहे. त्यांच्याकडून इतर साथीदार आणि उर्वरित मुद्देमालासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
सुरक्षा ऑडिट करण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कामगिरी करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुनील कासार, सपोनि नंदकिशोर सोळंके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.










