कळंब
शहरातील अंबाबाई मंदिरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर पाच आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कळंब येथील रहिवासी असलेले शंकर बाबुशा पवार (वय ४१) हे ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास अंबाबाई मंदिरासमोर उभे असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी पिंटु राजेराव पवार, गंगाराम बापु पवार, बबलु राजेराव पवार, सुनिल लाला पवार आणि बप्पा रामराजे पवार (सर्व रा. जुनी दुध डेअरी समोर, कळंब) यांनी मागील भांडणाच्या वादातून शंकर पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वस्तारा आणि चाकूचा वापर करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर शंकर पवार यांनी १ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









