कळंब
महायुतीला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे यांनी २२५४ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे कळंबच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये थेट व तिरंगी लढत झाली. प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले होते. मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आपली भूमिका स्पष्ट केली. यंदा ७२३१ महिला व ८००३ पुरुष अशा एकूण १५,२३४ मतदारांनी मतदान केले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत १२१९ मतांची वाढ झाली आहे. ही वाढीव मते निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दि. २१ डिसेंबर रोजी संत गोराबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तीन फेऱ्यांत मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच महायुतीने आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखली. शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी ७६८९ मते मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. महाविकास आघाडीच्या रश्मी संजय मुंदडा यांना ५४३५ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रा. मिनाक्षी श्रीधर भरव यांना १८६० मते मिळाली. अखेरीस २२५४ मतांच्या फरकाने महायुतीचा विजय निश्चित झाला.
नगरसेवक पदाच्या निकालातही चित्र समसमान राहिले. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी दहा जागा मिळाल्या असून नगर पालिकेत बळकटीची राजकीय लढत पुढील काळातही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीतील भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी महत्त्वाच्या प्रभागांमध्ये विजय मिळवत संघटनात्मक ताकद दाखवून दिली, तर महाविकास आघाडीनेही शहरी मतदारांमध्ये आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
महायुती मधील भाजपच्या योजना अनंत वाघमारे १५५ मतांनी, शितल चोंदे ६०, लखन गायकवाड १२७, हर्षद अंबुरे ८ मते, भुषण करंजकर ४७०, शीला शिवा पवार १०१ मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे रोहण पारख २९१ मते, अमर चाऊस ५१२ मते, पुजा धोकटे ८४ मते, अतुल कवडे १४३ मतांनी विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडी मधील उबाठा गटाचे ज्योती हारकर १०९ मते, जमील कुरेशी १०८ मते, इंदुमती हौसलमल २०४ मते, अशा सुधीर भवर ११२ मते, सागर मुंडे १७१ मते, सफुरा काझी ९७ मते, मोसीन मिर्झा ६३ मते, वनमाला शंकर वाघमारे १७, रुक्शाना बागवान ६२ मते कॉग्रेस अर्चना प्रताप मोरे २१० मतांनी विजयी झाले आहेत.










