कळंब
पूर आणि अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या कळंब तालुक्यात अनेक घरांचे संसार वाहून गेले. शेतं पाण्याखाली गेली, आणि लहानग्यांच्या शालेय बॅगा, पुस्तके, वह्या—सगळं काही चिखलात गडप झालं. अशा कठीण काळात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केवळ सहानुभूतीच नाही तर कृतीतून माणुसकी दाखवली.
कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या वह्या, बॅगा आणि खाऊ वाटप करून या कार्यकर्त्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हरवलेले हसू परत आणले. “पुन्हा शिकायला मिळणार,” या एका भावनेने मुलांचे डोळे चमकले.
हा उपक्रम म्हणजे फक्त साहित्यवाटप नव्हता, तर शिक्षणाच्या प्रवाहात अडखळलेल्या लहानग्यांना नव्या उत्साहाने पुढे जाण्याचा आधार होता. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे, सहकारी गणेश दहिभाते आणि नकुल भोईर यांनी स्वतः तांदुळवाडी येथे जाऊन ही मदत पोहोचवली.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या अतुल गायकवाड, काकासाहेब जाधव, जावेदभाई सौदागर, विलास गुंठाळ, अक्षय मुळीक, विक्रम चोंदे, विशाल यादव, शशिकांत पाटील, नितीन काळे, भास्करराव पाटील, बालाजी डीकले, आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, शिक्षक आगरकर आणि सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे आभार मानले. त्यांच्या डोळ्यांतून उमटलेले धन्यवाद शब्दांपेक्षा जास्त काही सांगून गेले मदतीच्या या छोट्या कृतीतून उभी राहिली एक मोठी आशा.











