जिल्हा परिषद शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक स्थळांची भेट
धाराशिव :
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासून नवीन क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करावा. तसेच या शैक्षणिक सहलीतील अनुभव लेखन स्वरूपात नोंदवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानातून धाराशिव जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इस्रो सहलीसाठी रवाना होत असताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, कार्यक्रम समन्वयक सुनिता काटकर, संशोधन सहाय्यक तेलंग, कनिष्ठ अभियंता सुजित गरड, राम राऊत आदी उपस्थित होते.
राज्याबाहेरील या शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक, सामाजिक व वैज्ञानिक स्थळांची माहिती देणे आणि त्यांच्यामध्ये उपक्रमशीलता व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे हा आहे. या सहलीमध्ये केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, नेपियर म्युझियम, त्रिवेंद्रम प्राणीसंग्रहालय, कोलंब बीच, लाईट हाऊस, सागरीका मरीन एक्वेरियम, पद्मनाभन स्वामी मंदिर तसेच बेंगलोरमधील विश्वेश्वरय्या संग्रहालय, उच्च न्यायालय आणि विधानसभा आदी ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या की, त्यांच्या शालेय जीवनात अशा प्रकारे राज्याबाहेरील सहलीची संधी मिळाली नव्हती. मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या आविष्कार अभियानामुळे राज्याबाहेर जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्याची संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी या सहलीतील अनुभवांचे लेखन करून सादरीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन अध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र खंदारे यांच्या हस्ते सहलीच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तप्रसाद जंगम यांनी केले, तर आभार शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी मानले.
६ दिवसांची शैक्षणिक सहल
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानातून रविवार (दि.१५) रोजी बेंगलोर मार्गे केरळकडे शैक्षणिक सहल रवाना झाली. सहलीचा कालावधी सहा दिवसांचा असून प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या ४५ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यामध्ये २५ मुली व २० मुले आहेत. तसेच माध्यमिक स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या ११ मुली व ११ मुले असे २२ विद्यार्थी सहभागी आहेत. अशा प्रकारे एकूण ६७ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले आहेत.
सहलीचे अनुभव लिहून ठेवावेत
विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना मिळावी यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आविष्कार अभियानांतर्गत इस्रो सहलीसाठी विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यान घेतलेले अनुभव लिहून ठेवावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.











