स्वच्छतेच्या प्रश्नावर नगराध्यक्षा कापसे यांची सोशल मीडियावरून नाराजी
कळंब
शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगर पालिका प्रशासन प्रयत्नशील असताना काही नागरिकांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे यांनी अशा बेजबाबदार वर्तनावर नाराजी व्यक्त करत नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे.
नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सुनंदा कापसे यांनी स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू असून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. काही भागांत कचरा उचलण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी होत असल्या तरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचरा दररोज उचलला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र तरीही काही नागरिकांकडून थेट रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याने मुख्य रस्त्यांवर अस्वच्छतेचे चित्र दिसू लागले आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधत नगराध्यक्ष कापसे यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट संदेश दिला आहे की, बेजबाबदार वर्तन कदापि सहन केले जाणार नाही. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हा आपला सामूहिक हेतू आहे.
नगराध्यक्षांच्या या पोस्टनंतर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर काही प्रमाणात तरी आळा बसतो का, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रथमता कळंबकरांची माफी मागते. 🙏
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील कचरा नगरपरिषदेकडून उचलण्यात आलेला नाही. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही व्यापारी वर्गाचे बेजबाबदार वर्तन याला कारणीभूत आहे.
व्यापारी वर्गाचा कचरा संकलित करण्यासाठी ठराविक वेळेत घंटा गाडी येत असते. ज्या भागात घंटा गाडी वेळेत येत नसेल, त्यांनी नगरपरिषद कार्यालयात येऊन किंवा मला फोनद्वारे सूचना कराव्यात. त्या रस्त्यावर घंटा गाडी वेळेत पाठवण्याची व्यवस्था नगरपरिषद निश्चितपणे करेल.
मात्र असे बेजबाबदार वर्तन कदापि सहन केले जाणार नाही. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करणे हा माझा मुख्य हेतू आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे सिसिटिव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. ते सार्वजनिक करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, इतकीच माफक अपेक्षा आहे.
सौ. सुनंदा शिवाजी आप्पा कापसे
नगराध्यक्ष, नगर परिषद कळंब













