समर्थक आक्रमक, अजित पिंगळे यांच्याभोवती आरोप-प्रत्यारोपांचा भोवरा
धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता या संघर्षाने सोशल मीडियावरही उघड रूप धारण केले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्या समर्थकांकडून “आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नेमके कोणाच्या ताब्यात राहणार यावरून विविध गटांत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सत्तासंघर्षात भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी पालकमंत्री तथा शिवसेना आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्यात मतभेद उफाळल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना पक्षांतर्गत संघर्ष उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, गटबाजी आणि नेत्यांमधील वाढता तणाव यामुळे आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद नेमका किती टोकाला जातो आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.
अजित दादा पिंगळे या पेज वरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट चर्चाचा विषय ठरली आहे..
आदेश फक्त शिंदे साहेबांचाच…
शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि महायुतीचा घटक आहे. पक्षाचे निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतात, त्यामुळे अजित दादा पिंगळे यांचे नाव घेऊन उसणायची जी सवय आहे, ती बंद करा..
पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात हे माहीत नसेल, तर राजकारणाचे धडे घेऊन अभ्यास करून या. तुमच्या नेत्याच्या वैयक्तिक द्वेषापायी पक्षाचे नुकसान आम्ही सहन करणार नाही. आम्ही कोणाचे गुलाम नाही.तुम्ही असाल गुलाम कोणाचे तरी…
आमदारकीच्या प्रचारावेळी तुमचा नेता कुठे होता, किती सभा घेतल्या हे आधी स्पष्ट करा. फक्त नेता असणे पुरेसे नसते; कर्तृत्व काय तेही सांगावे लागते.
पालकमंत्री साहेब आणि राजन साळवी साहेब यांसारख्या पक्ष नेत्यांची भूमिका सोडून..
केवळ बोलबच्चन करून पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य टाळावे.
प्रवक्ता नसताना पत्रकार परिषद घेणे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, याचाही विचार व्हावा. सुरुवातीपासूनच स्वतःच्या फायद्यासाठी नेत्यांच्या मागे फिरून पाकीट वसुली किंवा वैयक्तिक उपस्थिती लावणाऱ्यांनी पक्षावर भाष्य न केलेलेच बरे.
अशी थेट आव्हान देणारी पोस्ट करण्यात आली आहे.










