राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन विशेष
धाराशिव – दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीसाठी ऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि जीवनशैलीतील बदल यामुळे ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत ऊर्जा बचत, कार्यक्षम ऊर्जावापर आणि पर्यावरणपूरक हरीत ऊर्जेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज बनली आहे. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारखी जीवाश्म इंधने मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. त्यामुळे शाश्वत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा पर्यायांकडे वळणे अनिवार्य झाले आहे.
धाराशिवची हरीत ऊर्जा क्रांती धाराशिव जिल्ह्यात मुबलक सूर्यप्रकाश आणि अनुकूल वाऱ्यामुळे पवनऊर्जा व सौरऊर्जा प्रकल्पांसाठी मोठी क्षमता उपलब्ध आहे. याच कारणामुळे अनेक नामांकित कंपन्या येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पवन आणि सौर प्रकल्प कार्यरत असून त्यातून लक्षणीय वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असून रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. तसेच पायाभूत सुविधा मजबूत होत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे.
पवनऊर्जा ही स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीची एक विश्वासार्ह पद्धत आहे. ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ ऊर्जा बचत नव्हे, तर स्वच्छ व नूतनीकरणक्षम ऊर्जा पर्यायांना प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वारा हा अमर्यादित नैसर्गिक स्रोत असल्याने पवनचक्क्यांमधून कोणताही धूर किंवा घातक वायू उत्सर्जित होत नाही. त्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पवनऊर्जा प्रभावी ठरते. पवनऊर्जा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील औद्योगिक व पायाभूत विकासाला चालना मिळते. या प्रकल्पांचा देखभाल खर्च तुलनेने कमी असल्याने दीर्घकालीन स्थिर दरात वीज उपलब्ध होते. सौर ऊर्जेच्या तुलनेत, पवनऊर्जा केवळ दिवसा मर्यादित न राहता दिवस-रात्र उपलब्ध राहते, कारण वारा नैसर्गिकरित्या सतत प्रवाही असतो.
सेरेंटिका रिन्यूएबल्सचे सीईओ अक्षय हिरानंदानी यांनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त अक्षय ऊर्जेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. भारत आता केवळ अक्षय ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यापुरता मर्यादित न राहता, २४x७ विश्वासार्ह स्वच्छ ऊर्जा पुरवठ्याकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. सौर आणि पवन ऊर्जेची मोठी क्षमता असलेला महाराष्ट्र, २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे देशाचे लक्ष्य गाठण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. या क्षेत्राला राज्यस्तरावर राजकीय व प्रशासकीय पाठिंबा मिळत असून, शेतीबाह्य (एनए) प्रक्रिया सुलभ करणारी अलीकडील धोरणे अक्षय ऊर्जेच्या वाढीस पोषक ठरत आहेत. जमीनमालकांचे हित जपत अक्षय ऊर्जा विकासाला चालना देणारी धोरणे—जसे की आयपीपींनी सुचविलेली ३३ केव्ही भरपाई मार्गदर्शक तत्त्वे—भविष्यातील वाढीसाठी महत्त्वाची ठरतील. महाराष्ट्राला पवन व सौर ऊर्जा क्षेत्रात देशातील अग्रस्थानी नेण्यासाठी सेरेंटिका कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त संवाद साधताना ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी स्पष्ट केले की पवनऊर्जा प्रकल्पांमुळे पर्जन्यमानावर परिणाम होतो किंवा पर्यावरणाचे नुकसान होते, हे दावे पूर्णपणे निराधार आहेत. सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या अभ्यासातून पवनचक्क्यांचा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही, हे सिद्ध झाले आहे. ढग साधारणपणे एक किलोमीटर उंचीवर असतात, तर पवनचक्क्यांची उंची त्यापेक्षा खूपच कमी असल्याने त्यांचा पर्जन्यमानावर किंवा स्थानिक हवामानावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
हरित ऊर्जेच्या नव्या युगात धाराशिवची ठाम वाटचाल….
भारताच्या हरित ऊर्जा भविष्याचा केंद्रबिंदू धाराशिव जिल्हा आज पारंपरिक ऊर्जाप्रणालीतून स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीकडे ठामपणे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात उभे राहत असलेले पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प केवळ स्थानिक विकासालाच चालना देत नाहीत, तर महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा क्षमतेला नवी दिशा देत आहेत. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, अनुकूल भौगोलिक परिस्थिती आणि वाढती ऊर्जा गुंतवणूक लक्षात घेता, धाराशिवमध्ये राज्यातील अग्रगण्य हरीत ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. स्वच्छ ऊर्जेच्या नव्या युगात धाराशिवचे योगदान निर्णायक ठरेल, असे आशादायी चित्र आज स्पष्टपणे दिसून येत आहे.










