कळंब : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा कळंब पोलिसांनी पर्दाफाश केला असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात संभाव्य दरोड्याचा मोठा प्रकार टळल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ काही संशयित व्यक्ती एकत्र जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते तयारी करत असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तात्काळ धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.
या वेळी आरोपींकडून दोन लोखंडी तलवारी, लोखंडी गज, लोखंडी रॉड, एक दोरी, दोन बॅटरी, कॅरीबॅगमध्ये तिखट पावडर तसेच काळ्या रंगाचे हेक्झा ब्लेड असा एकूण १ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विश्वास उर्फ सगुना अशोक काळे, श्रीकांत उर्फ बबलू बापू पवार, विक्रम आप्पा पवार, दिपक उर्फ बब्बी विलास पवार, दिपक उर्फ आकड्या नितीन पवार, कालीदास उर्फ बापू फुलचंद काळे, सुरेश उर्फ आबा बापू पवार, तानाजी सुर्यभान पवार, बालू उर्फ बालाजी शंकर पवार, दिपक उर्फ बजरंग रवि काळे, बड्या उर्फ महादेव कल्याण पवार, मुन्ना उर्फ पोपट सुभाष पवार यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा दासराव पुंडगे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. कलम ३१० (४), (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.











