कळंब
नगर पालिका निवडणुकीत राजकीय आखाडा पेटला असून विविध पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाने अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा गट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळंब नगर पालिका निवडणुकीची रंगत वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा पेच अद्यापही कायम आहे. तरीही दोन्ही आघाड्यांतील बहुतांश पक्षांतील अनेक भावी नगरसेवकांनी प्रमुख नेत्यांची मौखिक संमती घेऊन पक्षाच्या नावाने किंवा अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित मंडळी देखील त्या दिवशी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोणता निर्णय घेतो यावर आगामी निवडणुकीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर नजर; आजची भूमिका ठरणार निर्णायक
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अद्याप शून्य अर्ज; शेवटच्या दिवशी मोठा निर्णय?
महाविकास आघाडीत सन्मानजनक वाटा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आजवर एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असणार यावर आगामी निवडणुकीचे अनेक गणित अवलंबून राहणार आहे.










