शेतकऱ्याच्या अश्रूंना काय किंमत आहे…?
धाराशिव | प्रतिनिधी
शेती करताना मातीशी नाळ जोडलेली असते, पण जेव्हा तीच माती हातातून निसटते, तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाचं मोल काही उरत नाही. धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती आता याच वाक्याची साक्ष देतेय. आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन सरकार ला आणखीन किती शेतकरी आत्महत्या झाल्यावर जाग येणार आहे, असा संतापजनक सवाल विचारला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात पाऊसामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे, नेता येतो आणि फक्त आश्वासन देऊन जातो, पण शेतकऱ्याला कोणी खंबीरपणे पाठिशी उभा राहत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे, पावसाच संततधार दुःख आणि विषाचा शेवटचा घोट अशी मनाला हेलावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील ५५ वर्षीय पोपट पवार या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. पावसामुळे झालेलं पीक नुकसान, कर्जाचं डोकं वर करणं, आणि शासनाकडून मदतीचा अभाव या सगळ्यांचा ताण त्यांच्या मनावर इतका गडद झाला की शेवटी त्यांनी मृत्यूला आलिंगन दिलं. पवार यांच्या घरी पाच जणांचं कुटुंब एक पत्नी, दोन मुले, एक मुलगी. पण आता त्या घरात ‘बाप’ नावाची सावलीच हरवून गेली आहे.
रुग्णालयात उपचार सुरू होते, पण मृत्यूने त्यांचं शेवटचं स्वप्नही हिरावून घेतलं. आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबाला धीर दिला, पण ते अश्रू पुसता-पुसता हातही थरथरत होते, सण एकीकडे आणि शोककळा दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंब विजयादशमीचा आनंद साजरा करत आहेत, त्याच वेळी एका शेतकऱ्याने आपल्या आयुष्याचा पराभव स्वीकारला.
शासन अजून किती बळी घेतल्यावर जागं होणार…?
धाराशिव जिल्ह्यात आठवड्याभरात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राजकीय मंडळी येतात, भेटी देतात, फोटो काढतात, आणि आश्वासनांचं ओझं पुन्हा एका गरीब कुटुंबावर टाकून निघून जातात. शेतकरी फक्त मतदार राहिला आहे. माणूस म्हणून त्याला कोणी पाहिलंच नाही. शेवटी किती वेळा माती मातीत मिसळणार?” शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं आहेत, पण ती कुणाला दिसत नाहीत. सरकारने आज न वळून पाहिलं, एकदा गावाकडे जाऊन पाहा, एखादं घर बंद दिसलं, तर समजून जा तिथला दिवा आता कायमचा विझलाय.
भूम तालुक्यातही अश्रूंनी पेटलेली शेती…
२४ सप्टेंबर २०२५ रोजी भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय ४२) यांनी शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. नदीकाठी असलेली शेती पावसाने खरवडून गेली. भूकंप होतो तेव्हा जमीन हलते, पण या शेतकऱ्यांच्या जीवनात दरवर्षी निसर्गच भूकंप घेऊन येतो. लक्ष्मण पवार यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या मागे राहिलं ते कर्जाचं ओझं, मातीत मिसळलेली मेहनत आणि भकास झालेलं आयुष्य.
तसेच तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केली होती. या अस्मानी संकट च्या विवंचनेतून शेतकरी टोकाचे पाऊल उचलुन जिवन संपवत आहे.










