धाराशिव –
लोहारा येथील सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या लोहारा पोलिस ठाण्यातील चौघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याला सहआरोपी न करण्यासाठी पोलिसांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडे तातडीने रक्कम उपलब्ध नसल्याने त्याने तात्पुरते दहा तोळे सोन्याचे कडे आरोपींना दिले. दरम्यान, तक्रारदाराच्या भावाकडून चार लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपींनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी सुरूच ठेवली होती.
एसीबी पुणे विभागाने 6, 7 आणि 10 नोव्हेंबर रोजी पडताळणी कारवाई केली. तपासात पोलीस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्त एएसआय बळीराम बोळके यांनी सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे मान्य केले. तसेच प्रभारी अधिकारी एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून तीन लाख रुपये घेतल्याचे आणि उर्वरित दोन लाख रुपये भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी चौघा आरोपी पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
निलंबितांमध्ये लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे, सहाय्यक फौजदार निवृत्त बळीराम बोळके, पोलिस अमलदार आकाश मधुकर भोसले आणि पोलिस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे धाराशिव पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.









