धाराशिव ता. 18: सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण यानुसार वाढीवची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.
जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पावसाचे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापुस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शासनास नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडुन मदत जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर सप्टेंबर मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली ऑगस्टमध्ये फक्त पिकाचे नुकसान झाले होते परंतु सप्टेंबर मध्ये त्याच पिकाखालची जमीन खरडुन गेली. त्यामुळे ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पुरस्थिती, चक्रीवादळ, या सारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एकवेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधुन विहीत दराने मदत देण्यात येते.मात्र धाराशिव जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे अहवाल सादर झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच पिकाखालील जमीन खरडुन गेल्याने शासन निर्णयाच्या निकषानुसार एका शेतकऱ्याला एका हंगामामध्ये दुसरी मदत मिळण्यास अडचणीचे ठरणार आहे. ऑगष्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये पिकाचे सर्वच नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याचे सर्वच क्षेत्र नुकसानग्रस्त म्हणुन दाखवले होते.
परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने जमीन खरडुन गेल्याने संबंधित शेतकऱ्यांची शेतजमीन व शेतीपिके यांचे एकत्रीत नुकसान दाखवण्यासाठी शेतजमीन शिल्लक नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे. त्याचबरोबर जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोरडवाहु जमीनीवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे महसुल,कृषी विभागाने केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगानाही नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे जे नुकसान ऑगस्ट च्या तुलनेत तीव्र आहे.त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुन र्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली आहे अशी माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.








