शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची ताकद वाढली.
कळंब
शहराच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रचंड गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कळंब नगर पालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली पालिका मानली जाते. त्यामुळे ती ताब्यात ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. जातीय आणि सामाजिक गणित आखत प्रत्येक गटाने आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील युवा नेतृत्व असणारे मोहसीन मिर्झा, शफीक बागवान, संदीप बिदादा, डॉ. साजेद चाऊस, जमील कुरेशी, धर्मेंद्र शहा, साबेर चाऊस, हमीद चाऊस, पवन वेदपाठक आणि उम्रान मिर्झा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंबमध्ये उद्धव ठाकरे गटाने आपले संघटन मजबूत केले असून विरोधकांच्या गडावर ताबा मिळवण्यासाठी खासदार आणि आमदार यांनी स्वतः आघाडी घेतली आहे. या प्रसंगी तालुकाप्रमुख सचिन काळे, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, शहरप्रमुख विश्वजीत जाधव, सागर मुंडे, सुधीर भवर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या राजकीय घडामोडींनंतर कळंब शहरातील निवडणूक आणखी रंगतदार बनली असून, आगामी काळात उबाठा आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.










